अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका; शेतकरी वर्गातून नुकसान भरपाईची मागणी
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
केम येथे शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. करमाळा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे केम मंडल मध्ये ३६ मि.मी. ईतक्या पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका कांदा, ज्वारी, तुर, केळी, द्राक्ष या पिकांना बसला आहे. केम परिसरात या वर्षी ज्वारीची पिके पोटऱ्यात आली होती. या वर्षी शेतकऱ्यांना साल चंदिचा माल होईल अशी आशा होती. पण, निसर्गाच्या लहरीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे.

केळीची झाडे पडली आहेत. अगोदरच केळीला भाव नाही. दलाल चार-पाच रूपये दराने केळी मागत आहे. केळीच्या बागेसाठी लाखो रूपये खर्च केला असून या भावात केळीचा उत्पादन खर्च ही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे ते कळेनासे झाले आहे. कांद्याच्या पिकात पाणी साचले आहे. अगोदरच कांदा चारशे-पाचशे रूपये क्विंटल या दराने विकला जात आहे. आता तर पावसाने कांदा नासणार आहे. त्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे. अशीच अवस्था द्राक्ष बागायतदार यांचीही झाली आहे. नुकत्याच द्राक्ष बागेच्या छाटण्या झाल्या आहेत. द्राक्षचा बहार धरला आहे. पावसाचे पाणी फुलोऱ्यात पडल्यामुळे द्राक्षावर दवण्या, करपा, कूज, जिरण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. द्राक्ष बागा या रोगांना बळी पडत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार दररोज फवारणी करत आहे.
तसेच ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने मजुरांना अक्षरशः रात्रभर जागावे लागले आहे. शेतकऱ्यांबरोबरच ऊसतोड मजुरांचेही या अवकाळी पावसामुळे हाल झाले आहेत.



