
प्रतिनिधी /अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मागील पंचवीस ते तीस वर्षात कधीही झाली नव्हती. पण, जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सुजाण नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे सदर ग्रामसभेची रीतसर वाडीवस्तीवर दवंडी व सोशल मीडियावर प्रसिद्धी करून ग्रामपंचायतीने जेऊर ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतली. हा तर जेऊर येथील ग्रामस्थांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बालाजी गावडे यांनी दिली.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, जेऊर येथील ग्रामपंचायतीमार्फत जो अनागोंदी कारभार सुरू आहे. त्याबाबत माझ्यासह माझे सहकारी मित्र श्री. बाळासाहेब कर्चे, देवानंद पाटील यांनी वेळोवेळी आवाज उठविला. आमच्या तक्रारींमध्ये तथ्य होते. म्हणूनच, ग्रामपंचायत दप्तराची तपासणी होऊन ग्रामपंचायतीमध्ये अपहार झाल्याचे सिद्ध झाले. लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालावा, तिथे ग्रामसभा व्हावी, लोकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावी. ही आमची न्याय मागणी अनेक दिवसांपासून होती. ती आता पूर्ण झाली आहे. हा संपूर्ण जेऊर ग्रामस्थांचा विजय आहे असे मत त्यांनी नोंदविले.
या ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी लेखी अर्ज देऊन आपल्या तक्रारी मांडल्या व सर्व विषय जनरेट्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला मंजूर करावे लागले. अशी जेऊरकर नागरिकांत चर्चा आहे. आता मंजूर झालेले विषय व कामे कामे मार्गी लागतात का फक्त राजकीय स्टंट ठरतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सदर ग्रामसभेला सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती लावल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. या सभेत बालाजी गावडे, बाळासाहेब कर्चे, राजू तांबोळी, पै. आप्पासाहेब मंजुळे यांचे सह अनेक नागरिकांनी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा केली.




