कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हाच उजनी पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाय- मा.आ. नारायण पाटील
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते- पाटील यांनी प्रस्तावित केलेला कृष्णा- भीमा स्थिरीकरण प्रकल्प हाच उजनीवरील कायमस्वरूपी उपाय असल्याचे ठाम प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. वाशिंबे ता. करमाळा येथील उजनी पाणी परिषदेच्या सभेत ते बोलत होते. उजनी पाणी परिषदेची पाचवी सभा आज वाशिंबे ता. करमाळा येथे पार पडली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधूकर (काका) झोळ, हरीभाऊ झोळ, शिवाजी बापू झोळ, रामदास बोबडे, तुकाराम बापू झोळ, तानाजी आबा झोळ यांच्या हस्ते उजनी कलश पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मा.आ. पाटील पुढे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास मान्यता मिळाली तर भविष्यात उजनी धरणात कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी घेऊन येथील पाणी पातळी कायमस्वरूपी समांतर वा स्थिर राहील. अन्यथा मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उजनीचे पाणी घेऊन जाणाऱ्या कृष्णा- भीमा- मराठवाडा बोगद्याचा फटका उजनी धरणास बसणार आहे. उजनीतील गाळ व नियमित होणारे बाष्पीभवन या बाबी दुर्लक्षित करुन पाणी वाटप होणे ही बाब चुकीची आहे. सध्या केवळ पुणे जिल्ह्यातील पावसाचे पाणी उजनीत अडवून साठवले जात आहे. उजनीत पाणी येण्याचा हा एकमेव स्रोत असून पाणी जाण्यासाठी मात्र १४ पेक्षाही जास्त प्रकल्प कार्यान्वित आहेत. यामुळेच कृष्णेतून कर्नाटकात जाणारे अतिरिक्त पाणी उजनीत वळविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा एकमेव चांगला प्रकल्प असून यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना समवेत घेऊन वेळप्रसंगी जन आंदोलन उभारण्यात येईल. असे संकेत माजी आमदार नारायण पाटील यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ (बापू) यांनी केले.
यावेळी आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संतोष खाटमोडे, माजी उपसभापती दत्ता सरडे, प्रा.डाॅ. संजय चौधरी, प्रा. अर्जुन सरक, बाळदादा झोळ, माजी उपसभापती नितीन जगदाळे, केतूरचे सरपंच विलास कोकणे, हनूमंत सरडे, अजिनाथ कवितके, संजय फडतरे, राजू झोळ, बापू कोकरे, कल्याण मोरे, धनंजय इंगळे, रविंद्र जावळे, रामभाऊ झोळ, भगवान डोंबाळे, संदीप झोळ, कांतिलाल झोळ, अजित झोळ, हर्षवर्धन पाटील, शिवा मारकड, शिवा डोंबाळे, बाळासो झोळ, अनूरथ झोळ, आप्पासाहेब मगर, नंदकुमार साळुंखे, अमोल भोईटे, अर्जुन झोळ आदी उपस्थित होते.
आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे यांनी ठरावांचे वाचन केले. सूत्रसंचलन संजय फडतरे यांनी केले तर आभार सरपंच मनिषाताई झोळ यांनी मानले. या उजनी पाणी परिषदेस वाशिंबेसह उंदरगाव, गोयेगाव व सोगाव पश्चिम येथील धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.




