‘या’ कारखान्या विरोधात २४ सप्टेंबरला आंदोलन; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे महेश चिवटे यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर लि. विहाळ या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१८ – १९ मध्ये ऊस गाळपास दिलेल्या अनेक शेतकऱ्यांचे २६६ रुपये प्रमाणे अंतिम बिल दिले नाही. त्याचबरोबर अनेक वाहनधारकांच्या नावावर त्यांच्या परस्पर काढलेले कर्ज प्रकरणी कारखान्याची चौकशी व्हावी. तसेच शेअरच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर रोजी शुक्रवारी करमाळा तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण व आंदोलन होणार आहे. तरी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भैरवनाथ शुगर या कारखान्याने सन २०१८ – १९ मध्ये उसाला २२००/- रुपये भाव देतो असे आश्वासन दिले होते. वृत्तपत्रातून तसा बातम्या प्रसिद्ध केल्या आणि गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिने उसाला २२००/- रूपये प्रमाणे भाव दिला. मात्र, नंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ चालू केले अजूनही जवळपास दीड लाख मेट्रिक टन उसाचे प्रति टन २६६/- रूपये प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे काढून ठेवले आहेत या पैशाला दोन वर्षे उलटून गेली तरी कारखाना प्रशासन शेतकऱ्याला दाद देत नाही. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रचंड पैशाची गरज आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार तानाजी सावंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत.
तसेच या साखर कारखान्याने अनेक वाहनधारकांच्या नावावर शेतकर्यांच्या परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. हे कर्ज थकीत झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर बँकेचे नाव लागले असून संबंधित बँका वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. शेतकऱ्यांची थकबाकीमुळे पत खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही बँक पिक कर्ज देत नाही. याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी कारखान्यावर विचारपूस करण्यासाठी गेल्यास त्यांना कर्मचाऱ्याकडून कारखान्याच्या गेटवर हाकलून दिले जाते. त्याच प्रमाणे गेली दहा वर्षापासून शेअर्स म्हणून प्रत्येकी शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. या रकमेला हा कारखाना व्याज देत नाही किंवा लाभांश देत नाही व ही रक्कम परत मागण्यास गेल्यास शेतकऱ्याला हुसकून लावले जाते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
आमदार तानाजी सावंत यांनी एक तर शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत किंवा या सर्व प्रश्नांचा खुलासा उद्धव साहेब ठाकरे यांच्यापुढे मांडावा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सातत्याने साखर उतारा कमी दाखवून एफ आर पी कमी काढायची व शेतकऱ्यांचा ऊस कवडीमोल भावाने खरेदी करायचा असा प्रकार सातत्याने या कारखान्यातून होत असून याचीही चौकशी साखर आयुक्त पुणे यांनी करावी.
महेश चिवटे
शिवसेना उपजिल्हाप्रमुख



