कोळगाव धरणाचे अतिरिक्त पाणी नेरले पाझर तलाव व अनाळा सिंचन प्रकल्पात सोडावे; ‘यांनी’ केली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा व परांडा तालुक्याच्या सीमेवरील नदी पात्रावर असलेले तसेच करमाळा तालुक्याच्या पूर्व भागांतील शेतकऱ्यांची जल वरदायिनी म्हणून उपयुक्त असलेले सिना कोळगाव धरण १००% भरलेले आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. ते वाया जाणारे पाणी नदी पात्रात सोडण्या ऐवजी नेरले पाझर तलावात व अनाळा उपसा सिंचन प्रकल्पात सोडावे अशी मागणी सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील व नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात श्री. निळ व पाटील यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिना कोळगाव प्रकल्प जलाशयात १००% जलसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी नदी पात्रात सोडण्यात आलेले असून ते पाणी वाया जात आहे. तसेच सिना कोळगाव धरणातील पाणी साठा ज्यावेळी कमी होत असतो त्यावेळी नेरले पाझर तलावात व आनाळा उपसा सिंचन योजना चालू करून पाणी सोडण्याची मागणी केली जाते व धरणातील पाणी सोडले जाते. त्यामुळे आम्हा धरणग्रस्त शेतकऱ्यांना विनाकारण त्रास होत असतो. त्यावेळी विनाकारण राजकीय दबाव तंत्राचा वापर करून काही लोक मुद्दाम पाणी सोडण्याची मागणी करत असतात. त्यामुळे आमच्या धरणग्रस्त भागांतील शेतकरी बांधव यांचे वर अन्याय होतो. आमची घरे व शेती बुडीत झालेल्या असतानाही आमच्याच पिकांना पाणी मिळत नाही. पर्यायाने धरणग्रस्त शेतकरी व इतर लोक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आत्ता अतिरिक्त वाहून जाणारे पाणी नदी पात्रात न सोडता नेरले पाझर तलाव व अनाळा उपसा सिंचन योजनेत सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे.
आपण आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. अन्यथा ऐन वेळी आम्ही आमच्या हक्काचे पाणी इतरत्र कुठेही सोडू देणार नाही. याची प्रशासनाने नोंद घ्यावी असेही श्री. सतीश नीळ पाटील यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे. तसेच सदर निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग उस्मानाबाद, कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग परंडा, तहसीलदार करमाळा यांनाही देण्यात आलेल्या आहेत.




