प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी. या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची घोषणा केली गेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
या वेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, गेली १५ दिवस झाले सरकार गांजा आणि चरसच्या मागे लागले आहे. मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ भेटत नाही ही मोठी शोकांतिका आहे. सरकार व महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर दबाव येत आहे. कारवाई ची भाषा केली जात आहे हे दुर्दैव असुन आंदोलन करणाऱ्या एका जरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: आंदोलनात सहभागी होणार आहे. असा इशाराच भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.
यावेळी करमाळा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांनी आगार प्रमुख अश्विनी किरगत यांची भेट घेऊन आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी केली. आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल एस टी कर्मचाऱ्यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे आभार मानले. तसेच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवण्याची मागणी केली.
या वेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सरचिटणीस काकासाहेब सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अमोल पवार, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, विनोद महानवर, आजिनाथ सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




