करमाळा प्रतिनिधी/संजय साखरे


करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रेशन कार्ड धारकांच्या विविध समस्या असून त्याचे निराकरण लवकरात लवकर करावे, अशा आशयाचे निवेदन करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पाटील यांनी करमाळ्याचे तहसीलदार श्री. समीर माने साहेब यांना दिले आहे.

सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आजच्या परिस्थितीत कोरोनामुळे शासनाकडून रेशनकार्ड धारकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतू, यामध्ये बऱ्याच शिधापत्रिकाधारकांना यापासून वंचित राहावे लागत आहे. नवीन रेशन कार्ड काढणे, त्याचे विभाजन करणे, एपीएल/ बीपीएल कार्डधारकांना धान्य वाटप न होणे, याशिवाय शिधापत्रिकेवर नवीन नावाची नोंद झाल्यानंतर ही नवीन नोंद करण्यात आलेल्या लाभधारकांना त्यांचा माल न मिळणे यासारख्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे.
यामुळे नवीन रेशन कार्ड देणे व त्याचे विभाजन करणे या विषयाचे अधिकार रेशन दुकानदारांना देण्यात यावेत. म्हणजे, हा प्रश्न तात्काळ सुटेल असे ही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




