प्रतिनिधी/वाशिंबे


करमाळा तालुक्यातील पुर्व सोगाव ते उमरड दरम्यान ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची मागील दोन वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना खड्ड्यातुन मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. नागरीकांना प्राथमिक उपचारासाठी व महिलांना प्रसुतीसाठी याच मार्गाने जेऊर करमाळा येथे जावे लागते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
पुर्व सोगाव हे पुनर्वसन झालेले गाव असून उजनी लाभक्षेत्रात येत असल्याने पाणथळ जमिनीमुळे दलदल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्ते खचण्याचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची ऊंची वाढवुन दुरस्ती करण्याबाबत बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला तरीही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरीकांची होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल. असा ईशारा पुर्व सोगाव येथील ग्रामस्थांनी करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
यावेळी विजय गोडगे, ऊपसरपंच तानाजी राखुंडे, अतुल गोडगे, ज्ञानेश्वर गोडगे, धनंजय गोडगे, ब्रम्हदेव सरडे, भाऊ राखुंडे, रेवन्नाथ गोडगे, भागवत मांढरे, रामभाऊ पांढरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



