दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू; कुकडीचे पाणीही उद्या करमाळा तालुक्यात दाखल होणार- आ.संजयमामा शिंदे
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून कुकडी प्रकल्पाचे पाणीही करमाळा तालुक्यात उद्या दाखल होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली आहे
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


उजनी धरण ३३ टक्के पेक्षा अधिक झाल्यास तात्काळ खरीप आवर्तन सुरू करण्याच्या सूचना आमदार संजय मामा शिंदे यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उप अभियंता यांना दिल्या होत्या. त्यानुसार करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन आजपासून सुरू झाले आहे. हे आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालणार असून ६० दिवस चालणार आहे अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

तसेच कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लो चे पाणी उद्या रात्री पर्यंत करमाळा तालुक्यात प्रवेश करील. कुकडीचे पाणी हे धरणातून होणाऱ्या विसर्गावर अवलंबून आहे. विसर्ग कमी अधिक झाल्यास पाण्याचा कालावधीही कमी जास्त होऊ शकतो. कुकडी प्रकल्पाचे पाणी मागणीनुसार करमाळा तालुक्यातील रायगाव, वीट आदी गावांना सोडले जाणार आहे. धरणातून होणाऱ्या विसर्गानुसार व तालुक्यातील लोकांच्या मागणीनुसार अधिकचे पाणीही इतर गावांना सोडले जाईल अशी माहिती कुकडी चे कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांनी दिली.
सध्या भीमा खोरे मध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणामध्ये ५५ टक्के पेक्षा अधिक पाणी साठा झालेला आहे. या तुलनेत करमाळा तालुक्यात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे लोकांना खरीप आवर्तनाची आवश्यकता आहे. याच धर्तीवर हे आवर्तन सुरू होत असल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.




