-->
करमाळागड किल्ले

प्रवास गडकिल्ल्यांच्या,ध्यास दुर्गसंवर्धनाचा

त्रिंगलवाडी ( Tringavadi)

किल्ल्याची ऊंची :  3238

इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर दहाव्या शतकातील जैन लेणी आहेत. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येते असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्य़ांच्या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे

इतिहास :
किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे :
त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची लेणी (गुहा) आहे. इथे ८ गुहा असून त्यापैकी ६ गुहा पायथ्याशी आहेत. तर २ गुहा डोंगरावर आहेत. दहाव्या शतकात कोरलेली ही जैन लेणी आहेत. पायथ्याजवळचे मुख्य लेणे आयताकार आहे. ओसरी, मंडप व गाभारा अशी त्याची रचना आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम आढळते. मंडपाच्या विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात कोरीव काम केलेले आहे. गाभार्‍यात वृषभनाथाची पद्मासनातील भग्न मूर्ती आहे. सभामंडपाच्या ४ खांबांपैकी ३ खांबांची पडझड झाली आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे.

लेण्यांच्या बाजूने गडावर वाट जाते. साधारण १५ मिनिटात आपण डोंगरसोंडेवर पोहोचतो. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याची कातळ टोपी दिसते. कातळटोपी खाली आल्यावर दोन वाटा दोन वाटा फ़ुटतात. कातळटोपीच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे. तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. पण किल्ला चढतांना डावीकडून जावे आणि उतरतांना उजवीकडील वाटेवरून उतरावे. डावीकडून किल्ल्यावर जातांना पायर्‍यांच्या अगोदर एक छोटासा कातळटप्पा आहे. तो सहज चढून जाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून उंच पायर्‍या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांना एक वळण दिलेल आहे. पायर्‍या संपल्यावर समोरच ५ फ़ूट उंच हनुमानाची मुर्ती आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेले अप्रतिम सुंदर प्रवेशव्दार आहे. त्यावर दोन कोपर्‍यात दोन शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराला वळसा घालून पुढे गेल्यावर वाड्याचा चौथरा दिसतो. त्याच्या समोरच कातळात खांब रोवण्यासाठी बनवलेले खळगे पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या ठिकाणीही घर असावीत. पायवटेवरुन पुढे जातांना एक पायवाट खाली जातांना दिसते. ती पायवाट किल्लावर उजवी कडून येणारी वाट आहे.

त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्‍या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. यावाटेने चढून गेल्यावर कातळाच्या पोटात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जणांना राहता येते. त्याच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा आहे. दोन्ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके लागते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो. मंदिराच्या मागुन गडाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे. शिखरावर एक झेंडा लावलेला आहे, काही अवशेष नाहीत.

शिखर पाहून झाल्यावर आल्या मार्गाने परत फ़िरून दोन वाटा फ़ुटतात तिथ पर्यंत यावे. तिथून खाली उतरणार्‍या पायवाटेने गेल्यावर उजव्या बाजूस वाड्याचा चौथरा दिसतो. तो पाहून पायर्‍यांपाशी यावे. येथे पूर्वीच्याकाळी प्रवेशव्दार असावे आता फ़क्त तटबंदीचे अवशेष आहेत. पायर्‍या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. तशीच एक गुहा पायर्‍या उतरल्यावर समोरच्या कातळात वर कोरलेली दिसते. या दोनही गुहा टेहळणीसाठी बनविण्यात आल्या होत्या. त्यांची रचना अषी केली होती की, वेगवेगळ्या भागावर नजर ठेवता येईल. गड फिरण्यास साधारण १ तास लागतो.

 

राहाण्याची सोय :किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत…: करावी.
पाण्याची सोय :गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close