करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ४४ कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या ४४ साखर कारखान्यांमध्ये अनेक संचालक हे आजी-माजी मंत्री, आमदार व खासदार असलेले दिसतात. वेळेवर FRP न देणे, वजन काट्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणे तसेच तोडणी व वाहतूकदरांचे पैसे वेळेत न देणे इत्यादी कारणावरून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील ४४ साखर कारखाने रेड झोन मध्ये टाकलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख ,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार भारत भालके, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार शामल बागल यांचे साखर कारखाने आहेत.
महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनापैकी १८ टक्के साखर उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. सोलापूर जिल्ह्यात खाजगी आणि सहकारी मिळून जवळपास ४० साखर कारखाने आहेत. त्यामुळे साखर उत्पादनाच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असे म्हणतात. या ४० साखर कारखान्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १४ साखर कारखाने साखर आयुक्तालयाने रेड झोनमध्ये टाकले आहेत.
यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल सहकारी गुरसाळे, मकाई सहकारी भिलारवाडी, लोकमंगल ऍग्रो भंडारकवठे, लोकमंगल ऍग्रो बीबीदारफळ, सिद्धनाथ शुगर तिरहे , गोकुळ शुगर धोत्री, मातोश्री लक्ष्मी अक्कलकोट, जय हिंद शुगर आचेगाव, विठ्ठल रिफाइंड पांडे, गोकुळ माऊली शुगर तडवळ, भीमा सहकारी टाकळी सिकंदर, सहकार शिरोमणी भाळवणी हे ते १४ कारखाने आहेत.
आ. बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना करकंब युनिट २, आ. संजयमामा शिंदे यांचा विठ्ठल कार्पोरेशन लि., आ. बबनदादा शिंदे शुगर केवड हे ४ साखर कारखाने हे शेतकऱ्यांची एफ आर पी वेळेवर देतात, ऊसतोडणी वाहतूक ही बिले वेळेवर देतात. त्यामुळे या साखर कारखान्यांचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांनी घेणे आवश्यक आहे. साखर कारखाना हा एक व्यवसाय आहे. तेथे कोणतेही राजकारण न करता पूर्ण व्यवसायिक पद्धतीने काम केल्यास यश मिळते, कारखाने सुरळीतपणे चालतात हा आदर्श शिंदे बंधूंच्या साखर कारखान्यांनी घालून दिलेला आहे. त्याचे अनुकरण जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी करणे आवश्यक आहे.
विठ्ठल रिफाइंड पांडे हा शिंदे यांचा साखर कारखाना यावर्षी रेड झोन मध्ये असला तरी पुढच्या वर्षी हा साखर कारखाना निश्चितच रेड झोन च्या बाहेर येईल अशी कार्यपद्धती सध्या कारखान्याचे व्यवस्थापन मंडळाने अवलंबलेली दिसते. कारखान्याची सुरुवात झाली त्यावेळेसच दुष्काळ पडणे, कारखान्याला पुरेसा ऊस उपलब्ध न होणे, कारखाना नवीन असणे या काही अडचणीमुळे साखर कारखाना तोट्यात दिसत आहे. पुढच्या वर्षी मात्र कठोर परिश्रमाच्या जोरावरती हा साखर कारखाना रेड झोन च्या बाहेर निश्चितच असेल असा आशावाद शिंदे बंधू बाळगून आहेत.
सहकाराचा स्वाहाकार होत असताना, कोरोणामुळे कित्येक उद्योग डबघाईला येत असताना शिंदे बंधूंच्या जवळपास सर्वच कारखान्यांनी वेळेवर उसबिले देऊन शेतकऱ्यांना संकटकाळात तारण्याचे काम केले आहे. आपल्या सभासदांप्रती विश्वास जपण्याची भावना शिंदे परिवाराप्रमाणे जपल्यास सहकाराला आणि साखर कारखानदारीला पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा सोन्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही..




