
प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीत वीट जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असून, या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आपल्या पत्नी सौ. अश्विनी गणेश चिवटे या उमेदवार म्हणून निवडणूक ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
पत्रकारांशी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आम्ही वीट गटात सातत्याने विकासकामे केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधा आणि महिला बचत गटांचे सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकहिताची अनेक कामे पूर्ण केली आहेत. वीट गटातील गावांमध्ये मागील काही वर्षांत २० ते २५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. आमचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नसून, गटाचा सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांना संधी मिळवून देणे हा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमचे धोरण आहे.
वीट गट महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळात असे मानले जाते की, चिवटे यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर या गटात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून, चिवटे कुटुंबाच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळाल्याची चर्चा रंगली आहे.



