करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


बफर स्टॉक मधील यूरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते दिला जात असून या योजनेचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र होटकर यांनी केले. बफर स्टॉक मधील युरिया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव जाधव, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक एस एस पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे, आमदार संजय शिंदे गटाचे नेते सुजित बागल आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार समीर माने म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सिंचन क्षमता वाढली असून त्या प्रमाणात रासायनिक खत पुरवठा व्हावा यासाठी आमचे जिल्हा पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त खते करमाळा तालुक्याला मिळावीत म्हणून संपूर्ण आराखडा जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याकडे सादर केला आहे असे तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी सांगितले. यावेळी बोलताना महेश ऍग्रो एजन्सी चे महेश चिवटे म्हणाले की, बफर स्टॉक योजनेतील ५० टन युरिया आमच्याकडे उपलब्ध झाला असून प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते आधार कार्ड नुसार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण उपलब्ध झालेली 50 टन कॉन्टिटी अत्यंत थोडी असून दोन दिवस सुद्धा हि पुरणार नाही त्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याकडे जास्तीत जास्त युरिया मिळावा यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. यावेळी भ्रमणध्वनीवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने म्हणाले की, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शासनाने बफर स्टॉक योजना राबवली आहे. ही योजना काटेकोरपणे राबवली जात असून उपलब्ध केलेला युरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते द्यावा व त्याचा संगणक प्रणालीवर अंगठा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याची नोंद ठेवावी, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. या योजनेत गैरकारभार होणार नाही याकडे कृषी विभागाचे कटाक्षाने लक्ष राहणार आहे. ही योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी कृषी विभाग डोळ्यात तेल घालून काम करत आहे. या योजनेतून पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची यादी तात्काळ कृषी विभागाकडे जमा करण्याची जबाबदारी कृषी विक्रेत्यांनी पार पाडावी कृषी विकास अधिकारी शंकर मिरगणे यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर घेणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करू असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनीही युरियाचा वापर कमी करून एनपीके खताचा वापर करावा असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला विदाऊट लिंकिंग दोन पोते युरिया मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.



