प्रतिनिधी/प्रविण अवचर


दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागाईचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे. किराणा माल, मिठाई, कपडे बाजारपेठ आदी दुकानांमध्येही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. नवीन कपडे, रांगोळी, पणत्या, कंदील, फराळ बनवण्यासाठीचं साहित्य याची जोरदार खरेदी सुरु आहे.
दररोज होणारी पेट्रोल, डिझेल ची दरवाढ तसेच, गॅसची ही सतत होणारी दरवाढ यामुळे मात्र, दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असणाऱ्या वस्तूंच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस च्या दरवाढीने नोकरदारांपासून सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नियोजन च कोलमडले आहे.
महागाई चा अक्षरशः विस्फोट झाला असतानाच कालपासून प्रवाशी भाड्यात पण मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच महागाई चे चटके बसत होते. त्यात आता प्रवासी भाडे वाढी मुळे ऐन दिवाळीत प्रवासही महागला आहे. त्यामुळे दिवाळी कशी करणार..? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
महागाई कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करताना दिसत नाही. जनतेला ऐन दिवाळीत महागाई चे गिफ्ट देऊन राजकीय पक्ष मात्र नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ही खूप खेदजनक आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरवाढीमुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने जनतेला चांगलाच फटका बसल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याची प्रतिक्रीया दुकानदार आणि व्यावसायीक व्यक्त करताना दिसत आहेत. ग्राहकांकडेही आर्थिक तंगी असल्याने दिवाळीच्या आनंदावर आर्थिक मंदी आल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळत आहे.




