
प्रतिनिधी/वाशिंबे


करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेज फाटा- पारेवाडी- जिंती चौक- डीकसळ ते भिगवण या जिल्हा प्रमुख मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश झोळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
झोळ यांनी निवेदनात म्हटले आहे कि, हा मार्ग सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात ऊस, केळी, पप़ई सह ईतर अन्य फळ पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे हा परिसर फ्रुट व शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. तसेच संपूर्ण मार्ग उजनी लाभ क्षेत्रालगत असल्यामुळे याच मार्गावरून आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक होत असते.
या परिसरातील समृद्धीसाठी कृषि क्षेत्राला व्यवसायिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी व विस्तिर्ण उजनी जलाशयातील पक्षी निरीक्षण, कृषी, पर्यटन व मत्स व्यवसायाला चालना देण्यासाठी या मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा देऊन विकसित करणे गरजेचे आहे. या मागणीचा विचार करुन राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. सदर निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, अकलूज व सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.




