कमलाभवानी शुगर ऊसतोड मजूरांना प्रति टन ५० रूपये वाढीव दर देणार- चेअरमन श्री विक्रमसिंह शिंदे
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील कमला भवानी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ हा गळीत हंगाम सुरू असून या हंगामात ऊस तोडणीसाठी ऊस तोड मजूरांकडून ऊस उत्पादकांची होणारी आर्थिक अडवणूकीचा विचार करून दि. ०१ एप्रिल २०२२ पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणा-या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी मजूरांना रू. ५०/- प्रति मे. टन प्रमाणे वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री. विक्रमसिंह शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहीती देताना शिंदे म्हणाले की, आज अखेर कमलाभवानी कारखान्याचे ६३६८७९ मे. टन उसाचे गाळप झालेले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून हंगाम एप्रिल अखेर पर्यंत चालणार आहे. कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस तोडणी मजूरांची कार्यक्षमता कमी होत आहे. तसेच ऊस तोडणी करणा-या तोडणी मजूर यांचेकडून ऊस तोडणीसाठी शेतक-यांकडून आर्थिक अडवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस जळीत करून तोडण्याचे ही प्रमाण वाढलेले आहे. कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचा हिताचे निर्णय घेतलेले असून निरनिराळ्या मार्गाने शेतक-यांना मदत करण्याची भूमिका पार पाडलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतक-यांचे होत असलेले नुकसान टाळणेच्या दृष्टीने ०१ एप्रिल २०२२ पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणा-या सर्व मजूरांना रू. ५०/- प्रति मे. टन इतकी वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार आहे.
यामुळे ऊस तोडणी मजूरांनी शेतक-यांची आर्थिक अडवणूक न करता कोणत्याही प्रकारच्या वाढीव रक्कमेची मागणी करू नये तसेच ऊस जळीत करून तोडू नये असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
ऊस उत्पादक, सभासद शेतक-यांच्या नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होणार असल्याची माहिती संस्थापक- चेअरमन श्री. विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले.




