केळी अनुदानाची रक्कम परस्पर लुटली, चिवटे यांचा गंभीर आरोप; तहसीलदार ठोकडे यांचे फेर तपासणीचे आदेश

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. मात्र, ज्यांनी आयुष्यात कधी केळी लावली नाही त्यांना केळी पिकाची नुकसान भरपाई मिळाली आहे. तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठराविक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली आहे. या सर्व प्रकाराची खाते चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी लोकशाही दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत केली.
तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व सर्व खात्याचे खाते प्रमुख यांचे उपस्थितीत तहसील कार्यालयात सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व तक्रारी समजावून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत केळी अनुदान व शहरातील अतिक्रमण यावर वादग्रस्त चर्चा झाली.
गतवर्षी मे २०२४ मध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जागेवर पासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवून त्याप्रमाणे सध्या तालुक्यातील ४७३३ शेतकऱ्यांना ९ कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वितरित करणे चालू आहे. मात्र, प्रत्यक्ष अनुदान वाटताना ज्यांनी आयुष्यात केळी लावली नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे निदर्शनाला आल्यामुळे उमरड (ता. करमाळा) येथे केळी उत्पादक शेतकरी व संबंधित एजंट यांच्यात मारामारी झाल्याचा मुद्दा महेश चिवटे यांनी बैठकीत मांडला.
तालुका कृषी कार्यालयाने नुकसानीचा गोषवारा दिला होता. मात्र, पंचनामा करताना तालुक्यातील काही तलाठ्यांनी शेतकऱ्यांशी व एजंटशी तडजोड करून ज्यांच्या शेतात केळी नाही अशा लोकांची नावे यादीत घातली. यामुळे केळी नसताना सुद्धा काही शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे अनुदान मिळाले आहे. यासंदर्भात खोटा व बनावट पंचनामा करण्यासाठी एजंट मार्फत काही तलाठ्यांनी मध्यस्थी करून २५ ते ५० % रक्कम असे ठरवून व्यवहार केला असल्याचा आरोप तहसीलदार शिल्पकार ठोकडे यांच्या समोर चिवटे यांनी केला आहे.
काही शेतकऱ्यांच्या केवळ एक गुंठा केळीचे नुकसान झालेले असताना त्यांना दोन दोन एकराचा लाभ मिळवून दिला आहे. नुकसान झालेले दुसरी कडील फोटो पंचनाम्याला जोडून कागदपत्रात सुद्धा फेरफार केली असल्याची चर्चा आहे. ज्या शेतकऱ्यांचे मार्च २०२४ मध्ये केळी नुकसान झाले आहे व पंचनामा झाला नसल्यामुळे त्यांना रक्कम मिळाली नाही. अशा सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना
कृषी विभागाकडून पंचनामे केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या असून तलाठ्यांनी केलेली यादी सुद्धा मागवली असून या दोन्ही याद्यांचे क्रॉस चेकिंग करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात येईल परंतु ज्यांचे नुकसान झाले नाही मात्र यादीत नाव आले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार नाही.
शिल्पाताई ठोकडे, तहसीलदार, करमाळा.




