
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


दोन दिवसांपूर्वी राज्याचे प्रधान सचिव संजय शेट्टी यांनी एसटी महामंडळाचे भाडेवाडीचा निर्णय घेतला यामध्ये तब्बल 14.97% एसटी तिकीट दरामध्ये भाडेवाढ करण्यात आली. या भाडेवाडीचा मोठा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसनार आहे. एकीकडे प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केलेली असताना दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय व बिकट झालेली असून तुटक्या फुटक्या बस मधून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळ प्रवाशांकडून वाढीव पैसे वसुल करत आहे तर त्यांना तशा सुविधाही त्या प्रमाणात का देत नाहीत? हा प्रश्न आज प्रत्येक प्रवाशाला पडलेला असून दरवाढी नंतर तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील अशा अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहेत.
एसटी महामंडळाच्या बसेस सतत बंद पडणे, तुटलेल्या काचा, तुटलेल्या खिडक्या, खिळखिळ्या झालेल्या बसेस या लांब पल्ल्याच्या प्रवासाला विविध राज्याच्या आगारातून सोडल्या जातात. सर्वसामान्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना अशा नादुरुस्त आणि तुटक्या फुटक्या बस मधून जीव मुठित धरून प्रवास करावा लागत आहे. “प्रवाशी आमचे दैवत” हे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुख सुविधांकडे सुद्धा लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तरी वाढत्या तिकीट दराप्रमाणेच प्रवाशांना एसटी महामंडळांकडून चांगल्या, सुस्थितीत, आरामदायी बसेसची व्यवस्था करून द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवचर व प्रवासी संघटने कडून करण्यात आली आहे.
प्रवासात एसटी बसेस या महामंडळाने ठरवून दिलेल्या अधिकृत हॉटेल वरती जेवणासाठी नाश्त्यासाठी थांबवतात. परंतु त्या हॉटेल्स मधून प्रवाशांकडून दाम दुप्पट दर घेतला जातो. तसेच तेथील जेवणाची नाश्त्याची क्वालिटी ही अतिशय निकृष्ट असते. प्रवाशांना व्यवस्थित सुविधा दिल्या जात नाही. अशा दुपटीने प्रवाशांकडून रक्कम वसूल करणाऱ्या हॉटेल्स वरती एसटी महामंडळांकडून योग्य ती कारवाई करायला हवी.
संभाजी बागल




