
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


जातेगाव ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग ५१६ यामधील करमाळा तालुक्यातील जाणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी म्हणजे रस्त्याच्या कामाला गती गती येईल. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, प्रीतमसेठ राठोड, सम्राट खानोरे, विपिन दोभाडा यांचा समावेश होता. दिल्ली येथील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळांनी भेट घेतली.
यावेळी संपूर्ण देशातील खाजगी तत्वावरील पहिला बाह्य वळण रस्ता 1996 रस्ता करमाळा शहरात केला कोर्टी ते डिकसळ या रस्त्याला ३२ कोटी रुपये निधी देऊन करमाळा तालुक्याला भरीव निधी दिला. याबद्दल नामदार गडकरी यांचा करमाळा तालुका वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग ५१६ चे नगर जिल्ह्यातील चापडगाव ते अहमदनगर या रस्त्याचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. मात्र याच रस्त्यात समावेश असलेला जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्या च्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. सोलापूर भूसंपादन कार्यालयाने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून केंद्र शासनाकडून मान्यता मिळताच तात्काळ भूसंपादन होऊन रस्त्याचे कामाला सुरुवात होणार आहे. या भूसंपादनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.
अक्कलकोट येथे आल्यानंतर नितीन गडकरी यांनी चार महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ गडकरी यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक बिराजदार यांना यासंबंधीतील सर्व फाईल दोन दिवसात माझ्यासमोर आणा असे सांगितले.
त्याचबरोबर कुगाव, चिखलठाण, शेटफळ, जेऊर, साडे, सालसे या रस्त्यासाठी १० कोटी रुपये, सीना नदीवर नवीन पूल बांधणे या कामासाठी १५ कोटी रुपये तसेच करमाळा, बोरगाव, घारगाव ते जिल्हा हद्द प्रजिमा ५ सुधारणा करणे यासाठी पाच कोटी रुपये केंद्रीय रस्ते विकास निधी सीआरएफ फंडातून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.




