
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम पुर्ण करा अन्यथा जन आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत तहसिलदार व जिल्हाधिकारी यांनाही रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु व्हावे म्हणून लक्ष देण्याची मागणी पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, करमाळा तालूक्यातून जाणारा दौंड- राशीन- कोर्टी- करमाळा- आवाटी- बार्शी असा हा मार्ग असून राज्यमार्ग क्र. ६८ मधील किमी १३७/०० ते १८९/०० म्हणजेच कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम बंद आहे. प्रशासकीय मान्यता तसेच सुमारे १६९ कोटी रुपयांची तरतूद असतानाही केवळ ठेकेदाराच्या चालढकलपणा व निष्क्रियतेमुळे या रस्त्यावरील दुरुस्तीचे काम बंद आहे. ठेकेदार हा रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास नकारात्मक मानसिकता दाखवत असुनही संबंधित विभागाकडून या ठेकेदारास वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. सदर ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजू अर्धवट उखडून ठेवल्यामुळे दळणवळणास धोका निर्माण होऊन अपघातांची शक्यता जास्त प्रमाणात तयार झाली आहे. यावर छोटे मोठे अपघातही होऊ लागले आहेत. या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने धूळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालनांना जीवावर बेतून वाहने चालवावी लागत आहेत.
सध्या ऊस गाळपाचा हंगाम असुन या मार्गावर ऊस वाहतूक वाढली आहे. अंबालिका, बारामती ऍग्रो आदिसह करमाळा, दौंड, बारामती, राशीन आदि भागातील साखर कारखान्यांना जाणारा ऊस या मार्गाने जात आहे. ऊस वाहतून करताना या मार्गावर वाहने रखडली जात असल्याने याचा परिणाम ऊसाच्या वजनावर होत असून याचा विचार केला तर भविष्यातील शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त केला जावा, बंद असलेले काम त्वरीत सुरु करुन रस्त्याचे काम वेळेत आणि लवकर पुर्ण केले जावे. अशी मागणी करत जर प्रशासनाने आठवडाभरात यावर गंभीरतेने विचार करुन पुढील कार्यवाही न केल्यास संबधित ठेकेदार बदलून त्यास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जावे व इतर कार्यतत्पर व कार्यक्षम ठेकेदाराकडून हे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन घ्यावे. अन्यथा यासाठी आंदोलन केले जाईल असा इशाराही माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
तसेच या रस्त्यावरील नागरिकांची होत असलेली गैरसौय, प्रशासन व ठेकेदार यांचा चालढकलपणा व निष्क्रियता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्या समोर प्रत्यक्ष भेटून आपण हा प्रश्न मांडणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.




