आदिनाथच्या शेअर्सची किंमत कमी झाल्यामुळेच बचाव समितीला वर्गणी मागण्याची वेळ- ॲड. अजित विघ्ने
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेले तीन गळीत हंगाम बंद आहे. यावर्षी मात्र, तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने तसेच आदिनाथ कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते कारखाण्याबाबत आपली मते व्यक्त करत आहेत. यामुळे कारखाना सतत चर्चेत आहे. यातच आता तालुका बार असोसिएशनचे तालुका उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने यांनी आदिनाथ कारखान्याच्या शेअर्सची किंमत कमी झाल्यामुळेच बचाव समितीला वर्गणी मागण्याची वेळ आली आहे. असे वक्तव्य केले आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, आदिनाथ सह. साखर कारखाना कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या खाजगी कारखान्याच्या ताब्यात गेल्यास कारखान्याच्या शेअर्स ची किंमत कमी होइल असे बेजबाबदार वक्तव्य ॲड. देशपांडे यांनी केले आहे. वास्तविक आदिनाथ कारखान्याची दयनीय अवस्था कोणी केली ? विद्यमान संचालक यांचेमध्ये मेळ आहे का ? मागिल काही काळात आपल्याच लोकांनी केलेल्या चुका यामुळे आज कामगार आणि शेतकरी अक्षरशः भरडुन निघाले आहेत. कारखान्याला वाचवायला निघालेली मंडळी कारखाना बचावच्या बॅनरखाली आज एकत्र दिसत असली. तरी ती सुद्धा वेगवेगळ्या विचारांची मंडळी आहेत.
वस्तुतः आदिनाथ कारखान्याचे खाजगीकरण होणार नसताना वारंवार खाजगी करणाचा मुद्दा पुढे करून बचाव समिती सभासंदाच्या मनात भीती व संभ्रम निर्माण करत आहे. भाडे करार केला म्हणजे खाजगीकरण होऊ शकत नाही. कारखाना हा करारानेच चालवला जाईल परंतु निवडणुक प्रक्रीया ही सहकार कायद्या प्रमाणेच होणार आहे. त्यामुळे बचाव समिती कडुन वारंवार विपर्यास करण्यात येत आहे.
कारखान्याच्या शेअर्सची किंमत आधीच शुन्य केली असुन बचाव समितीचे प्रमुख प्रत्येक भाषणात प्रत्येक सभासदाला वाढीव १००००/- प्रत्येकी शेअर्स मागणी करीत आहेत. शेअर्स ची किमंत बारामती ॲग्रो मुळे शुन्य होइल असे सन्माननीय ॲड. देशपांडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. सध्या जे आहे ते नीट सांभाळुन वाचविण्या करिता प्रयत्न करणे महत्वाचे असुन बचाव समिती चा प्रयोग आणि रोजरोज ची वक्तव्ये बदलणारी आहेत. यासाठी वस्तुस्थितीचा अभ्यास आणि भविष्य काळातील नियोजन महत्वाचे आहे. शेअर्स ची किंमत ही कधीच शुन्य होणार नाही. कारण आपल्या सभासदांच्या हिताचेच निर्णय जो कोणी चालवेल त्याला घेणे क्रमप्राप्त आहे. याऊलट बारामती अँग्रो मुळे तर आदिनाथ कारखान्या च्या शेअर्स किंमत अधिकच वाढेल. तसेच भविष्यकाळात आदिनाथची निवडणुक झाल्यास आमदार संजयमामा शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांचे पॅनल कडे सभासदांनी कारखाना दिला पाहीजे असेही ते शेवटी बोलताना म्हणाले.



