
आकलुज/प्रतिनिधी


राज्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून मिळावा. अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे प्रेस, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. सोमवार दि. १७ ऑक्टोंबर रोजी सदर मागणीचे निवेदन उपविभागीय कार्यालय माळशिरस विभाग अकलूज येथे प्रांत अधिकाऱ्यांच्या वतीने अव्वल कारकून शशिकांत मनोहर चंदनशिवे यांनी स्वीकारले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सोमनाथ पांडुरंग खंडागळे, उपाध्यक्ष नौशाद शमशुद्दीन मुलाणी, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, बाळासाहेब हरी गायकवाड, सुनील संभाजी ओवाळ, बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड, मुझ्झंमिलहुसैन शहाजहान शेख आदि पत्रकारांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सह्या आहेत.
या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणारा कर्मचारी म्हणजे पोलीस आहे. सर्व पोलीस कर्मचारी आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. समाजाच्या व्यवस्थेमध्ये पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप अत्यावश्यक मानली जाते.
भांडण झाले पोलीस, दसरा आला पोलीस, दिवाळी आली पोलीस, ईद आली पोलीस, राजकीय नेते आले पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस, अपघात झाला पोलीस, आग लागली पोलीस, मंत्री आले पोलीस, खासदार- आमदार आले पोलीस, हत्या झाली पोलीस, आत्महत्या केली पोलीस कोणत्याही घटना घडल्यास सर्वप्रथम पोलिसांनाच बोलावलं जातं. असे पोलीस आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता २४ तास आपल्या देशाची सेवा करण्यात मग्न असतात. सण उत्सव आहे काय आणि नाही काय..? त्यांना कसलाच फरक पडत नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसात घरोघरी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करणाऱ्या महिला दिसतात. मात्र आमच्या पोलीस भगिनी एकाच रंगाची साडी घालून आपली सेवा बजावत असते. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व पोलिसांना एक महिन्याच्या पगार दिवाळी बोनस म्हणून द्यावा. अशी मागणी प्रेस, संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचा विचार करून राज्यातील पोलीस बांधवांना राज्य सरकार दिवाळीचा बोनस जाहीर करेल. अशी अपेक्षा शेवटी व्यक्त करण्यात आलेली आहे.



