
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली शाखा करमाळाच्या वतीने सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १६६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संत निरंकारी मंडळ सोलापूर झोनचे प्रमुख प.पू. इंद्रपालसिंह नागपाल महाराज, करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, दत्ता सरडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, नगराध्यक्ष प्रतिनिधी, नगरसेवक संजय सावंत, नगरसेविका स्वाती फंड, महादेव फंड, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, ‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गौरव पफाळ, शिवसेना जिल्हा समन्वयक निलेश चांदगुडे, पत्रकार जयंत दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प.पू. इंद्रपालसिंह नागपाल महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून मानवतेच्या सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. करमाळा शाखेने आजपर्यंत ५ हजार ३०० युनिट रक्तदान केल्याची माहिती त्यांनी दिली. उपस्थित मान्यवरांनीही मंडळाच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत रक्तदानासारख्या उपक्रमांना अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. रक्तसंकलनाचे काम इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दमाणी ब्लड बँक (सोलापूर) तसेच श्री रामभाई शहा रक्तपेढी (बार्शी) यांच्या पथकाने केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे, विजया भुजबळ, मुकुंद साळुंके, डॉ. भाऊसाहेब सरडे, मनधीर शिंदे, आत्माराम वायकुळे, बप्पा धडस, अंगद पडवळे, दत्तात्रय कोल्हे, एकनाथ निमगीरे, सुनिल भोगे, राजेंद्र भुजबळ यांच्यासह महिला व पुरुष सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाखामुखी पोपट थोरात यांनी केले.
समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम
संत निरंकारी मंडळ समाजात मानवता, बंधुभाव आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देत विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने करमाळा शाखेकडून सातत्याने रक्तदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५,३०० युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.



